Sunday 19 April 2015

पालिकेचे सूचना/ हरकती स्विकारण्याचे नियोजन सुध्दा फसले

मुंबईचा 2014-2034 या 20 वर्षाच्या विकास आराखडयाबाबत सूचना/ हरकती देण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले असले तरी आज विकास आराखडयाबाबत सूचना/ हरकती स्विकारण्यासाठी लिपिकांची टंचाई भासत आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांस निवेदन देत स्वतंत्र लिपिक वर्ग याकामासाठी देण्याची मागणी केली आहे.

अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांस दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले आहे की विकास आराखडा तयार झाल्यानंतर पालिकेने जनतेकडून सूचना/ हरकती मागविल्या आहेत. 8 एप्रिल 2015 पर्यन्त 19 हजार सूचना/ हरकती प्राप्त झाल्या आहेत. याकामी मोठया प्रमाणात लिपिकांची गरज असताना फक्त 2 लिपिकांवर कामकाज सुरु आहे. यामुळे नागरिकांना सूचना/ हरकती देताना त्रास तर होतो पण उद्या त्या सूचना/ हरकती संगणकावर नोंदणीकृत करताना दमछाक होणार आहे. शनिवारी नागरिकांची भाऊगर्दी पहाता विकास नियोजन खात्याने गेट क्रमांक 7 च्या बाहेर टेबल लावत सूचना/ हरकती स्विकारल्याची माहिती अनिल गलगली यांनी दिली. याकामी 10 लिपिकांची गरज असताना पालिकेने फक्त 2 लिपिक दिले असल्याची तक्रार करत अनिल गलगली यांनी ताबडतोब पर्याप्त लिपिकांची सोय करण्याची मागणी केली आहे.

मुंबईचा विकास आराखडयात असंख्य चुका करत नागरिकांच्या रोषाला बळी पडणा-या पालिकेचे सूचना/ हरकती स्विकारण्याचे नियोजन सुध्दा फसले असल्याची टीका अनिल गलगली यांनी सरतेशेवटी केली.

No comments:

Post a Comment